मराठवाड्याचे प्रश्न सुटले तर अनेक पिढ्यांना फायदा-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून त्याचा फायदा मराठवाड्याला मिळणार आहे यासाठी वॉटर ग्रीड ही योजना मंजूर झालेली आहे या माध्यमातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर हा प्रकल्प झाल्यास पुढील अनेक पिढ्यांना याचा फायदा होईल हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत गडावरील तिळाची ऊर्जा आणि गुळाचा गोडवा घेऊन आपण जे कडू बोलणारे आहेत त्यांना द्यावा असे सांगून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गडासाठी राहिलेले 23 कोटी तात्काळ द्यावेत अशी मागणी केली
श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ वा पुण्यतिथी महोत्सवास मंचावर महंत श्री. ह. भ. प विठ्ठल महाराज, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस,आ.बाळासाहेब अजबे, माजी आ. भिमराव धोंडे,आ.लक्ष्मण पवार, अक्षय मुंदडा, डॉ.योगेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री क्षीरसागर यांनी श्री. संत वामनभाऊ महाराज यांची महती व गहिनीनाथ गडाची माहिती सांगत गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी 25 कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी केवळ दोन कोटी रुपये मिळाले आहेत उर्वरित 23 कोटी रुपये मिळाले तर या ठिकाणी उपस्थित भाविकांच्या जनसमुदायांची व्यवस्था होईल राज्यसत्ता आणि धर्मसत्ता दोन्हीही एकत्र आले आहेत राजसत्तेकडून अन्न वस्त्र निवारा तर धर्मसत्तेकडून माणसाला माणूस जोडून समाज एकत्र आणण्याचे काम केले जाते संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांनी समाज जागृत करून वारकरी संप्रदायाची पताका अटकेपार फडकावली आहे मराठवाड्याचा विकास व्हावा यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी मिळाले तर आमच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ नाहीसा होईल आपण पायाला चाके बांधून संपूर्ण राज्यात फिरताय आमच्या मराठवाड्याचा कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे 20000 कोटीचा हा प्रकल्प आपण सोबत काम करत असतानाच मंजूर झालेला आहे हा जर प्रत्यक्षात झाला तर पुढील अनेक पिढ्यांना त्याचा फायदा होईल आज गडावरील तिळाची ऊर्जा आणि गुळाचा गोडवा घेऊन आपण राज्यात कडू बोलणाऱ्यांना हा प्रसाद द्यावा या गडाची ताकद फार मोठी आहे या ठिकाणी मिळालेला आशीर्वाद आपल्या भावी काळासाठी नक्कीच उपयोगी पडणार असल्याचे सांगून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली
गहिनीनाथ गडावरील विकासाचा आराखडा पूर्ण केला जाईल तसंच समुद्राला वाहून जाणारे हक्काचे पाणी वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला दिले जाईल. या भगीरथ प्रयत्नासाठी संत वामनभाऊंनी आशीर्वाद द्यावा असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
गहिनीनाथ गडावरील भगवा ध्वज हा नुसता ध्वज नसून जबाबदारी आहे. ती समर्थपणे पेलणार आहे. इथे आल्यानंतर मराठवाड्याची पंढरी पाहायला मिळाली. मुंबईवरून हेलिकॉप्टरने येताना अरबी समुद्र पाहिला आणि इथं आल्यानंतर गहिनाथ गडावरील भक्तीचा समुद्र पाहायला मिळाला. देवाच्या मनात असेल तर तो दर्शनासाठी बोलावतो आज वामन भाऊंनी बोलावले म्हणून मी इथे आलो. नाथ आणि वारकरी संप्रदायाचे मूळ या पवित्र स्थानावर आहे. देश देव आणि धर्म वारकरी संप्रदायामुळेच वाचला. संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचे काम वारकरी संप्रदायाने केले. आद्य ठिकाण वसलेल्या गहीनाथगडाचा विकास आराखडा लवकरच पूर्ण केला जाईल, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे




















