
नागपूर : अबू आझमी आणि भाजप हे एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ‘अबू आझमीने एखादं वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि त्यावरून भाजपने हिंदू-मुस्लिम भांडण लावायचं हे ठरलेलं आहे,’ अशी जहरी टीका त्यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले, अबू आझमी जे वक्तव्य करतात ते भाजपच्या इशाऱ्यावर करत आहेत. कुणाच्या तरी दबावातून ते बोलत असावे, असा आरोप करत पुढे ते म्हणाले, वारकरी संदर्भात झालेलं वक्तव्य मुद्दाम करून पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद उभा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा फायदा भाजपला होईल यासाठीच हे घडलं, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
काय म्हणाले अबू आझमी?
रस्त्यावर होणाऱ्या उत्सवांबद्दल कोणत्याही मुस्लिमाने कधीही तक्रार केलेली नाही. पण जेव्हा मशीद पूर्ण भरते, तेव्हा मशीदीतील काही लोक रस्त्यावर 5 ते 10 मिनिटे नमाज पठण करतात. तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की, ‘रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू’. पुण्याहून येताना लोकांनी मला लवकर निघायला सांगितले, अन्यथा पालखीमुळे रस्ता बंद होईल. रस्ता बंद आहे, पण आम्ही कधीही तक्रार केली नाही. मात्र रस्त्यावर नमाज केल्यास लगेच तक्रार केली जाते’, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.




















